शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

पंचपक्वानांचं ताट

 समोर असलेलं पंचपक्वानांचं ताट, त्यातले पदार्थ काही गोड, काही तिखट, काही आंबट, तुरट इत्यादी चवीने पूर्ण.. सुरुवात कुठून करावी हा ही प्रश्न पडतो कधी, पण सवयीप्रमाणे काही जण आपल्या आवडीचा पदार्थ शेवटी खाण्यासाठी राखून ठेवतात. तो पदार्थही बऱ्याचदा असा असतो की जेवताना एकदाच वाढण्यात येतो.

आपल्याला सवय असते जे काही नावडतं असेल ते पहिले संपवून शेवटी आपल्याला आवडणारा आणि ज्याची चव जिभेवर रेंगाळत राहावी असा पदार्थ आरामात मिटक्या मारत खावा. तसं जेवताना एक डोळा किंवा बारीक नजर त्या पदार्थाकडेच असते. आतून आपण खुश होत असतो आणि तो शेवट आपल्या मनात रुंजी घालत असतो. मस्तीखोर मित्रांमध्ये किंवा भावंडांमध्ये बसल्यावर तर कधी कधी त्या वाटीवर हात ठेवून जेवण उरकत असतो जेणेकरून कुणी तो पदार्थ पळवू नये..

पण बऱ्याचदा असं होतं की ताटातलं बाकीचं जेवण संपवण्याच्या नादात आवडीच्या पदार्थासाठी भूकच शिल्लक राहिलेली नसते. मग ते नंतर खाऊ, बांधून घेऊ आणि घरी जाऊन खाऊ किंवा घरीच असेल तर राखून ठेऊ, किंवा बळजबरी खाऊ हे पर्याय उरतात. तो सुरवातीला असलेला आनंद कुठेतरी हरवतो. आता तो पदार्थ म्हणजे एक जबाबदारी किंवा ओझं असल्यासारखं वाटू लागतं. त्याचा मनासारखा आस्वाद घ्यायचं राहूनच जातं.. मग वाटतं आधीच खायला हवं होतं का? थोडं थोडं प्रत्येक पदार्थासोबत संपलंही असतं..

आयुष्यासोबत देखील आपण बऱ्याचदा हेच करत असतो.. आनंदाचे, आवडीचे आणि खऱ्या अर्थाने "जगण्याचे" क्षण नेहमी लांबणीवर टाकत तिखट, आंबट, कडू, तुरट चवी पहिले संपण्याचा प्रयत्न करतो, हे क्षण एकदाचे जगून झाले की मग मनसोक्त गोड क्षण जगायला बघतो.. तसंच एखादा खूप आवडलेला शर्ट, ड्रेस, साडी, दागिना जपून ठेवतो नंतर खास प्रसंगी घालूया आता खराब होईल, पण ती वेळ येत पर्यंत त्यातला उत्साह निघून जातो किंवा आपल्या शरीराला आता ते बरोबर होत नसतं किंवा बरीच कारणं..

असे लांबणीवर टाकलेले आनंदाचे क्षण जगण्याचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा आपल्याकडे इच्छा, शक्ती, उत्साह, हुरूप ह्यापैकी काहीतरी उणीव जाणवतेच.. तेव्हा समोर आलेलं सगळ्या चवीने परिपूर्ण असलेलं पंचपक्वानांचं ताट काहीही राखून न ठेवता संपूर्ण आस्वाद घेत संपवलं तर तृप्त झाल्याची भावना नक्कीच मिळते..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...