शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा करायचे). त्यात पूर्ण वर्गाने मिळून आपापसात पैसे गोळा करायचे, जी वर्गणी गोळा झाली त्यात वर्गाची सजावट, प्रसाद, खाण्याचे पदार्थ आणि भेटवस्तू इत्यादी जमल्यास ते बसवायचं.. वसंत पंचमी च्या दिवशी किंवा पुढे मागे हा कार्यक्रम केल्या जायचा..

ह्या कार्यक्रमाची जबाबदारी अर्थात वर्ग प्रमुख आणि उप-प्रमुखाची असायची, ती दोघं सगळ्यांना कामं नेमून द्यायचे आणि त्याच्या प्रमाणे सर्व ती जबाबदारी पार पडायचे. ह्या साऱ्याची तयारी १०-१२ दिवसांआधी सुरु व्हायची, पूर्ण वर्गात जणू उत्सवाचं वातावरण असायचं. नाश्ता किंवा जेवण जे वर्गणीच्या आकड्यात बसायचं त्या नुसार कोण-कोण काय-काय पदार्थ बनवून आणेल ते ठरायचं (त्या साठी आधी घरी आई तो पदार्थ बनवून देईल का ते विचारून मगच दुसऱ्या दिवशी ती विद्यार्थिनी नक्की करायची).
वर्ग सजावटीचं काम सगळ्यांनी मिळून केलं जायचं, त्यात कुणी रंगीत पट्ट्यांची माळ बनवायचे, कुणी फुलांची सजावट, झाडांच्या छोट्या छोट्या कुंड्या तर कुणी घरून ओढण्या इत्यादी सामान आणून त्याची सजावट करायचे.. हे सगळं काम चित्रकलेचा, क्राफ्ट किंवा पी.टी. च्या तासाला त्या त्या शिक्षकांची परवानगी घेऊन करायला घ्यायचं.
पूजेच्या दिवशी वर्ग झाडून पुसून स्वच्छ करायचा, बाक सगळे व्यवस्थित लावून घ्यायचे जेणेकरून जागा मोकळी राहील आणि कार्यक्रम सुटसुटीत होईल. दारात छान रांगोळ्या काढायच्या, सरस्वती च्या फोटोची मांडणी, पूजेची सजावट, हार आणि फुलं आणून आणायची आणि फळ्यावर सरस्वतीचं चित्र काढायचं (कुणा दुसऱ्या वर्गातल्या मुलीला रांगोळी आणि चित्र छान जमत असेल तिलाही आपल्या कार्यक्रमात बोलून घेण्यात यायचं). ही तयारी लवकर लवकर आटोपून घरी जाऊन छान सजून परत यायचं, तोपर्यंत सगळ्या विद्यार्थिनी सजून आलेल्या असायच्या. त्या दिवशी शाळेचा गणवेश नसून रंगीत कपडे घालायला परवानगी असायची.
पूजेला शाळेतील सगळ्या शिक्षकांना एक दिवस आधीच आमंत्रण द्यायचं, ते आले की वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापिका ह्यांच्या हस्ते पूजा करून घ्यायची, सगळ्यांनी मिळून सरस्वतीचं गाणं आणि आरती म्हणून प्रसाद खायचा आणि त्या नंतर जेवण / नाश्ता करून कार्यक्रम संपन्न व्हायचा आणि सुट्टी होऊ सगळे आपापल्या घरी परतायचे..
ज्यांच्या कडे खाण्याच्या पदार्थाची जबाबदारी असायची त्यांनी स्वतः सायकल वर डब्बे मांडून चालत-चालत तोल आणि डब्बे सांभाळत आणायचे आणि रिकामे डब्बे कार्यक्रम संपल्यावर परत तसेच मांडून न्यायचे.. उन्हाळ्याची सुरुवात असल्यामुळे तापतं ऊन आणि त्या उन्हातून सायकल वर मांडलेले डब्बे वाजवत गप्पा करत चालतच घरी जायचं.. तो दिवस मजेतच संपायचा.. एका वर्गात सकाळी आणि दुपारी असे दोन वर्ग भरायचे तेव्हा दुसऱ्या वर्गाला छान सजलेला वर्ग मिळायचा..
प्रत्येक वर्गाचा असा हा स्वतंत्र कार्यक्रम वर्षातून एकदा व्हायचा.. ज्या वर्गाचा कार्यक्रम असायचा ते तर आनंदात असायचेच पण बाकी वर्गातील विध्यार्थीनी सगळं निरीक्षण करत असायचे, कुणी कसं सजलंय, वर्ग कसा सजवलाय, खाण्याचे पदार्थ काय ठेवले असणार, दारात रांगोळी कशी काढली ह्यापासून सगळंच.. तो एक दिवस तर धमाल असायचीच पण त्या आधीचे दिवस सुद्धा तयारी आणि जमवाजमव करण्यात मजेत जायचे.. कोणत्या वर्गाची पूजा सगळ्यात छान झाली हे सुद्धा निरीक्षण व्हायचं त्यामुळे सगळे आपापल्या परीने प्रयत्न करायचे..
ह्या सगळ्यातून जबाबदारीची जाणीव, नियोजन, मिळून काम करणे आणि कार्यक्रमाचं व्यवस्थापन आपोआप शिकता यायचं..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...