शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१

भेट

 आपल्या विस्मृतीत गेलेल्या आणि अचानक कधीतरी जाग्या होणाऱ्या कितीतरी आठवणी आणि त्याचं आता काही होणं नाही असं वाटून व्याकुळ होणारं मन.. ह्या सगळ्या आठवणी जोडल्या गेलेल्या असतात कधी जागेशी, कधी वस्तूंशी तर बऱ्याच वेळा लोकांशी..

कितीतरी व्यक्ती आपल्या व्यक्तिमत्वाला धार लावून जातात, काही हळवा कोपरा तयार करतात, काही राग करायला शिकवतात तर काही प्रेम करायला आणि लळा लावायला शिकवतात..
व्यक्ती तितक्या तर्हा, तितके मतभेद, तितक्याच वाटाघाटी आणि आणखीही बरंच काही..
आपला भलामोठा किंवा मोजका मित्र परिवार.. एका विशिष्ट वेळेत मित्र सोबती म्हणून भेटतात, काही काळ सोबत असतात आणि वेळ आली की निघून जातात, पुन्हा भेटण्याचे ठरवून.. परत वेगळी जागा, वेगळी वेळ, नवे सोबती, नव्या जमा होत जाणाऱ्या आठवणी आणि परत भेटण्याचे आश्वासन देत घेतला जाणारा निरोप.. कत्येकदा हे दूर जाणं परिस्थितीवर अवलंबून असतं, वेळच अशी येते की जाणं भाग पण नंतर भेटण्याचा विश्वास बळ देतो..
जरा भूतकाळात डोकावून बघा, त्यातल्या अर्ध्या जणांशी सुद्धा परत भेट झाली नसेल.. भेटायचं आहे पण वेळ नाही, वेळ आहे पण साधन नाही, कितीतरी कारणं.. बरं ही कारणं सगळी खोटी का? तर नक्कीच नाही. मैत्रीत दुरावा पण नाही.. कित्येक महिन्यांनी एखादा कॉल किंवा मॅसेज करूनही त्याच मित्रत्वाच्या भावनेने आणि त्या वेळी जसे असू तसेच एकमेकांसमोर व्यक्त होतो.. पण काही वेळा, भेटी ह्या परत होतंच नाहीत.. खूप फॉलोअप घेऊन एखादी स्वतंत्र किंवा ग्रुप भेट घडवता येतेही, नाही असं नाही, पण ती अचानक किंवा अति कष्ट न करता घडून आलेल्या भेटीची सर त्याला येत नाही..
असंच आपण आठवणी गोळा करत पुढे जातो आणि अचानक कुठल्याश्या अनपेक्षित वेळी आणि ती आठवण जागी होते.. भेटायला हवं कधीतरी असं म्हणून मनाशीच काहीतरी ठरवल्या जातं.. तेवढ्यावर मनाची समजूत काढून पुढ्यात असलेल्या कामात लक्ष दिल्या जातं.. अश्या कित्येक भेटी तिथेच राहून जातात.. खूप हव्या असणाऱ्या पण कधीच घडून न येणाऱ्या..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...