रविवार, २५ जून, २०१७

आपल्या वाटा

चालता चालता कुणाचा तरी थकलेला आवाज कानी आला... 
"फारच दमायला झालंय का ग तुला? थोडा श्वास तर घे, एवढ्या घाईत चालायला काय झालंय?"
"नाही कळायचं तुला, कित्ती दिवसांतून घरी यायला मिळालंय मला, तुला ह्यातली ओढ कशी सांगू?"
"खरंच गं, मला बिचारीला काय कळणार, मी वर्षानुवर्षे इथेच आहे, मला ना कुठे जायचं ना कुठून परत यायचं, माझं हेच नेहमीचं ठिकाण.." 
"म्हणूनच म्हणतेय नाही काही कळणार तुला, आता मला जाऊ दे हां, माझ्या येण्याची वाट बघत असणार कुणी.. "
"होय खरंच, कळतंय मला.. पण तूझा वेग कमी करशील का जरासा? काय आहे ना मला पण बोलायचंय गं थोडंसं.. हल्ली कुणाला मोकळा वेळच नसतो ना माझ्याशी बोलायला.. कुणीतरी सोबत सारखंच असतं त्यांच्या, एकतर हाडामांसाची माणसं किंवा तुमच्या मोबाईल मधून सोबत असणारी माणसं..."
"होय चालेल, तू बोलतेस तर थोडं हळू चालते मी.."
"तुला आठवतंय का आपलं नातं तसं बरंच जुनं.. तुझ्या बदलणाऱ्या आणि मोठ्या होत जाणाऱ्या हालचालींचा चांगलाच अनुभव आहे मला.. 
खरंतर तू आणि तुझ्या सोबतची सगळी मित्र मंडळी, तुम्ही सगळे मोठे झालात आणि आपापल्या स्वप्नांचे पंख पसरून भरारी मारलीत.. खूप कौतुक वाटतं मला तुम्हा सगळ्यांचं.. कुठे ती अनवाणी पायांनी सर्वत्र धावणारी तुम्ही मंडळी आता सूट बूट घालून येता तेव्हा त्या बुटांच्या आवाजात तुमच्या हृदयाची धडधड हरपून जाते... दमायला झालेल्या आणि श्वास चढून धाप लागल्यावर मटकन मातीतच खाली बसलेल्या तुमच्या शरीराला आता धुळीचा कणही सहन होत नाही ना? तुमचंही बरंच आहे गं, ध्येय असतात एकेकांची, तुम्ही मिळवलीत, आनंदच आहे.. पण तुमचं ते दूडदूड करत धावणं, ओरडणं, किंचाळणं, ढोपरं फोडून घेणं, पोट धरून हसणं आणि भोकाड पसरून रडणं सगळं कसं जिवंत होत तुम्हाला बघताच... तुमच्या खरचटलेल्या, रक्त निघत असणाऱ्या जखमांना बघून मलाही त्रास व्हायचा पण माझा नाईलाज असायचा.. तुम्हाला जखमा झाल्या तरी त्यातून जपून चालायला शिकलात ना? आता नव्या शहरांत, नव्या जागेत आणि नव्या माणसांत तुम्हाला कधी आठवण येते का गं माझी?? "

ज्या वाटेवरून मी चालत होते ती वाट माझ्याशी बोलतीये.. माझ्या घराची वाट, ज्यावरून आतापर्यंत अगणित वेळा चालले.. माझ्या बदलणाऱ्या पाउलांचा आकार माझ्या चपलांपेक्षाही अचूकपणे माहिती असणारी माझ्या घराची वाट... घराइतकं आणि घरातल्या कुटुंबाइतकंच ती ही वाट बघत असेल का जुन्या माणसांची... तिलाही आठवण येत असेल त्या खेळणाऱ्या, बागडणाऱ्या, हसणाऱ्या, रडणाऱ्या चेहेऱ्यांची.. तीच वाट मला तिचा अनुभव सांगते.. थोडं अनपेक्षित होतंच पण त्याही पेक्षा मन हळवं झालं.. तो आवाज आणि त्यातली आपुलकी जाणवून आपसूकच ते ऐकायला लागले.. खरंतर मोबाईल वरून सोबत असणारी दोस्त मंडळी होतीच माझ्या जवळही पण कुणास ठाऊक, त्या वाटेवरून आताही एकांतात जायलाच आवडतं. पाठीवर बॅगचं ओझं आणि नजर खाली वाटेवर असा थोड्या दूरचा प्रवास तिच्यावरचा. दुपारी कमी वर्दळीची आणि झाडाच्या सावलीत निपचित पडलेली.. ती सुद्धा आता आधुनिक झालीये, तिच्यावर डांबर पडून ती चकचकीत झालीये थोडी, पण कितीही बदल झाला तरी मनाची हळवी बाजू बदलत नाही तसंच वाटेचही झालंय. तिच्यावर पडलेल्या काळ्याकुट्ट डांबराखाली ती जुनी माती, मुरुमांचे खडक ओलेच असणार... कारण तिचेही बदलणारे रंग रूप आम्ही थोडे अधिक बघितलेच आहेत.. 

बुधवार, २१ जून, २०१७

लाटा

लाटा...

बेधुंद उसळणाऱ्या लाटांच्या आवाजानं मनात लय पकडली की तल्लीन होऊन त्या फेसाळणाऱ्या प्रवाहाला बघत राहावं... भान विसरून फक्त त्या गतीला आणि आवेगाला अनुभवावं... लाटांचा वेग भिनायला लागला ना की मग मन हलकं हलकं होऊन जातं. त्यांचा वेग वारा ठरवतो, समुद्राच्या पृष्ठभागावरुन तो जणू पाण्याचा एक एक पापुद्रा काढत लाट निर्माण करतो. समुद्राच्या आतल्या वादळाच्या पटीने लाटांची तीव्रता तशी कमीच पण ती अनोखी आहे. प्रत्येक वेळी ती नवीन असते... नव्याने येते आणि किनाऱ्याला भिडून परत फिरून जाते. ती जेव्हा किनाऱ्याला भिडते तेव्हा त्या प्रचंड आवाजाने, पाण्याच्या उडणाऱ्या तुषारने आणि सोबत तितक्याच वेगाने येणाऱ्या वाऱ्याने आपल्याला हलवून जाते, मनातून जागं करून जाते. तासंतास त्या एकापाठोपाठ येणाऱ्या लाटांना बघूनही मन भरतच नाही...  

लाटांसारखं होता आलं पाहिजे खरंतर... समुद्रातील अनावश्यक वस्तू तिच्या कुवतीनुसार किनाऱ्याला सुपूर्द करून ती परत फिरते, स्वच्छ होऊन जाते... परत नव्या लाटेसाठी सज्ज होते... असंख्य लाटा आणि तेवढेच त्यांचे समुद्र किनारी कोसळणे, परत जाणे आणि परत येणे.. हाच क्रम सतत सुरु असतो.. माणसांचं तरी वेगळं काय आहे? ती पण मनातल्या भावना सतत व्यक्त करत असतात.. प्रेम, राग, सुख-दुःख, करुणा, आणि बऱ्याच भावना घेऊन सतत पुढच्या माणसावर लाटांसारखंच कोसळतात आणि मग हलक्या मनाने परत आपल्या आयुष्यात चालत राहतात... पुन्हा काही घटनांचा वारा येतो, भावना तयार होतात परत कोसळतात आणि परत शांत... खरंतर असंच असायला हवं पण काही माणसं व्यक्त होतंच नाहीत, दाबून ठेवतात आतल्या आत आणि मग एकदाचं असह्य झालं की वादळाच्या रूपात कोसळतात.. सगळं उध्वस्त करतात... 

लाटांची मोजणी करत बसू नये, एका तासात किती एका दिवसात किती. मोजमापाच्या पलीकडे जाऊन ते सगळं अनुभवायला हवं. कदाचित ती आपल्या मनातला ताण ही किनाऱ्यावर सोडून जायला सांगत असते अगदी तिच्याच प्रमाणे...

मंगळवार, ६ जून, २०१७

ती...

ती... 

प्रत्येक घोळक्यात असणारी आणि कधीच कुणाच्या नजरेस न पडणारी अशी ती... 

तिच्या प्रत्येक हालचाली मध्ये एक कमालीचा शहाणपणा असतो, पण जपून चालणारी तिची हालचाल तिचा थोडा स्वतःबद्दल असणारा न्यूनगंड दाखवत असतो. चेहेऱ्यावर शांत भाव पण भिरभिरणारी नजर. सगळं काही सभोवतालचं जग आणि त्यातले पात्र ती नजरेने टिपून घेत असते. 

ती कुठेही दिसणारी, रंग रूप बांधा वेगवेगळा असला तरी प्रत्येक "ती"च्या मध्ये एक साधेपणा असतो. तिला प्रत्यक्षात काहीतरी निराळं हवं असलं तरीही चेहेऱ्यावर ते कधीच दिसणार नाही. तिच्या प्रत्येक शोधक नजरेत ती बहुदा स्वतःलाच शोधात असते... 

ती प्रवासात खिडकीच्या बाहेर शांतपणे बघत असते, वाऱ्यावर उडून विखुरल्या केसांना तसंच उडू देते, कधी कुणी बोलत असेलच बाजूला तर समोरच्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावरून सारं काही वाचण्याचा प्रयत्न करते, एकंदरीत ती मनाशीच गप्पा मारत असते (कारण स्वतःहून इतरांशी बोलण्याचं धाडस करायला ती हिम्मत जमवत नाही). कुणी लाजत लाजत मोबाईल वर बोलत असल्यास तिला भान हरपून बघत असते आणि परत कोऱ्या नजरेने बाहेर बघायला लागते. (तिलाही ते सगळं अनुभवायची इच्छा होत असेल का? अश्या हरवलेल्या क्षणांचा तर ती आढावा घेत नसेल ना?) स्टेशन आल्यावर आपली ओढणी नीट करत सावकाशपणे उतरून सभोवताल नजर टाकून ती नजर दुसऱ्याच क्षणाला खाली घेऊन शांत चेहेऱ्याने निघून जाते.

काहीतरी जगावेगळं करून दाखवलं तरच प्रकाशझोतात येणाऱ्यां पैकी एक तीही... महत्वाकांक्षा भरपूर असूनही काहीवेळा आपल्याला मार्ग सापडत नाही आणि तेच बहुदा तिच्या सोबतही होतं. काहीतरी आवश्यक आणि हव्या हव्याश्या गोष्टी स्वतःजवळही असाव्यात असं तिला सारखं वाटत असतं.

तिच्यातली मुलगी म्हणून असणारी सगळी बाजू जमेचीच असेल असेही नाही. ती आखीव रेखीव, बोलके डॊळे, काळेभोर केस आणि गव्हाळ कांती. तिला तिच्या सौंदर्याची जाणीव कुणी करून देणारं नसत एवढंच.  

कुठेही अशी ती नजरेस आली की तिच्याही मनसोक्त बोला, ती ही तिच्या परीने खुलून बोलायला लागेल आणि त्या हास्याची आणि तिच्या चेहेऱ्यावरच्या आनंदाची तुम्हाला तुलनाही नाही करता येणार. 

जर तिच्याशी बोलायचं तर आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागणार कारण तिच्या कोशात बंद असलेली ती स्वतःहून बाहेर निघतंच नसते. 

गुरुवार, १ जून, २०१७

पार्टनर

पार्टनर 
व पु काळे लिखित अप्रतिम पुस्तक... 
प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक पार्टनर हवाच असतो. आणि हा पार्टनर म्हणजे जोडीदार नाही, आयुष्याचा जोडीदार वेगळा आणि हा असा पार्टनर वेगळा. तो प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतो, मनावरचा ताण कमी करतो आणि त्याहीपेक्षा तो परिस्थितीशी लढायला शिकवतो. 
सुरवातीला त्याच्या व्यक्तिमत्वाचा आलेला अंदाज पुढे बदलत जातो. त्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू हळूहळू दिसायला आणि कळायला लागतात. पुस्तकात श्री च्या आयुष्यावर भाष्य केलेलं असलं तरीही पार्टनर हेही त्याचं मुख्य पात्र होऊन जातं. 

स्वतःचं नाव न सांगता फक्त पार्टनर नावाने ओळख बनवणारा (आपल्याला खरंतर नावाच नसतं, बारशाला ठेवतात ते नाव देहाचं), वडिलांच्या एका नजरेतल्या कटाक्षाने लहानपणीच घर सोडून निघून जाणारा पार्टनर, बेफिकीर आणि मर्जीने जगणारा पार्टनर, कुठल्याही बंधनात अडकून पडायचं नाही म्हणून लग्न न करणारा पण त्यातल्या प्रत्येक अडचणींवर उत्तर तयार असणारा पार्टनर, सगळ्या परिस्थितीचा उलगडा झालेला आणि सारं काही मनसोक्त जगलेला पार्टनर.... तो बोलतो "पश्चात्तापाच्या एकाही क्षणाने माझा वर्तमानकाळ खाल्लेला नाही, भूतकाळ अडवलेला नाही." तो कुठल्याही गोष्टीची  लळा लागू देत नाही, त्या आधीच त्यापासून बाजूला होतो, असा विक्षिप्त पार्टनर. 

श्री ला तो आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर भेटला, जमेल तेवढी मदत केली, मार्गदर्शन केलं, काही खुलासे केले आणि मानसिक बळ दिलं. त्याचं प्रेम, लग्न, संसार आणि घरच्या लोकांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायलाही शिकवलं. M आणि W मधला फरक आणि श्री च्या मनाची होत असलेली अवस्था त्याचे वर्णन वपुनीं खूप चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत.  ते लिहितात "आयुष्यात सगळी माणसं अशीच येतात आणि जातात. पार्टनर सारखी. जितकी जवळ, तितकीच दूर. जेवढी समजतात त्याच्यापेक्षा कितीतरी पट अनाकलनीय राहतात." 

असा पार्टनर सगळ्यांना मिळेलच असं नाही, पण ज्यांना मिळाला ते खरंच भाग्यवान. आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी अश्या असतात ज्या बोलून दाखवायला असा कुणी लागतो जो पूर्णतः परिस्थिती जाणून मग त्यावर निःपक्षपाती मत देईल, जे मिळू शकतं ह्याच पार्टनर कडून... 
शेवटी व पु म्हणतात "दुःख, आनंद, जय- पराजय, हसू-आसू, जन्म-मरण, विरह-मिलन सगळं तसंच असतं. प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं. एवढंच काय ते नवीन. पुनःपुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हे मरण. This is life! Our last garment is without pockets."

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...