सोमवार, ११ जून, २०१८

पाऊस

तर... एव्हाना फॉर्मल शूस, कपडे ओले झाले असतील, छत्रीने ऐन वेळी दिलेला त्रास किंवा छत्रीच सोबत नसल्याने चिडचिड झाली असेल. पहिल्या पाऊसात भिजायचा योग चुकीच्या वेळी आला असेल (किंवा मुद्दामही भिजले असाल).. चिडचिड होऊन सुरवात झालेली असो किंवा आनंदाने, ह्या पावसाने थंडावा मात्र मिळालाच. एरव्ही घाईत एक तरी सामान विसरायची सवय असणारे आता नेमाने छत्री सोबत ठेवणार, पावसावर चिडणार, रेनकोट असो किंवा छत्री डोकं सोडून बाकी संपूर्ण शरीर भिजवायचा पवित्रा पावसाने घेतलेला असला तरीही आपली केवालीवानी धडपड सुरु होणार. सगळं कसं प्लॅन करून येत असावा हा पाऊस. त्यातलं सारं काही नेमाने पूर्ण करतो दरवर्षी. हवं तसं बरसतो, हवं तेव्हा निघून जातो, वाट बघायला लावतो... सारं काही त्याचं प्लांनिंग, आपल्या हवामान खात्याचेही अनुमान पोकळ ठरवतो कधीकधी... 

आपण पण हट्टीच.. त्याला अनुभवण्याचे प्लॅन्स बनवतो, कधीतरी निसर्ग बघायला जातो, भिजत भिजत गड किल्ले चढ उतर करत धबधब्यांमध्ये भिजायला जातो, रस्त्यात भजी आणि चहा चा आस्वाद घेतो सगळं करतो... हे सारं काही कमी अधिक फरकाने दरवर्षी होतं.. 

पण काही गोष्टी मात्र हरवल्या...

आता शाळेत तळे साचून सुट्टी मिळत नाही, पाऊस पडून झाल्यावर निघणारे वेगवेगळे रंगीत किडे कुणी पकडत नाही, पावसाचं पाणी भरलेल्या डबक्यात उडी मारणारी, चिखलाने माखलेली बच्चे कंपनी आणि त्यांचे हसरे चेहरे कमी झालेत... "सांग सांग भोलेनाथ पाऊस पडेल काय", "ये रे ये रे पावसा" अशी गोड गीतेही मुलांपासून दुरावली.. बरंच काही हरवलंय आणि बरंच काही विसरलोय आपण... 

आता तर पावसाचं पाणी काचांवर पडून खाली ओघळूनही जातं, आपण दुर्लक्ष करत स्वतःच्या विश्वात गुंग. आधी कधीतरी त्याचा आवाज आणि भरून येणं कितीतरी वेळ बघत बसायचो आणि आता तो आत येऊ नये म्हणून त्याचं प्लांनिंग केलंय, मग खिडकीत बसून त्याच्या तुषारांना अंगावर घेत चहाचा आस्वाद आणि सोबत पुस्तक वाचायला विसरणारचं ना..  

ए सी च्या गार हवेत बसून आपल्याच कामात दंग असतो तेव्हा तो आभाळ भरून घेतो मग गरजून आणि बरसून निघूनही जातो. त्याचं काम तो करतोच आहे, आपलं प्लांनिंग बदललंय फक्त..  मोठं होताना बरंच काही सोडलंय आपण, त्यात पाऊस अनुभवणं ही सुटतच चाललंय.. कारण म्हणायला आता सुरक्षा आणि स्वतःची जपणूक ही लेबलं तयार आहेतच... 


सोमवार, २८ मे, २०१८

सच मेरे यार है..

लोकल ची गर्दी आणि गोंगाटात एक शांतता भरून आणणारा पूल, तो समुद्रावरून जाणारा, दोन स्टेशनांना जोडणारा पूल.. 
अरबी समुद्रावरून वाहणारा वारा, ते सर्वत्र पसरलेलं शांत पाणी, अंधारातही दिसणारं.. प्रकाश पडला की चकाकणारं.. 
त्या पाण्याकडे आणि समुद्राच्या विशाल पात्राकडे बघून मन कुठेतरी हरवून जातं.. कानातल्या हेडफोन्सवर जुन्या गाण्यांची प्लेलिस्ट वाजत असते आणि नजर त्याच्यावर खिळलेली असते... 
खरतंर त्याच्या कडे नजर वळताच आजूबाजूला चाललेल्या गोंगाटाचा फरक पडेनासा होतो.. गर्दीही काहीशी शांत होऊन बाहेर बघत असते..  
अश्या वेळी कधी आवडीचं सागर चित्रपटातलं गाणं सुरु होतं... 
सच मेरे यार है, बस वहीं प्यार है 
जिसके बदल मी कोई तो प्यार दे,  
बाकी बेकार है... यार मेरे... यार मेरे... 
आणि त्याच्या प्रत्येक शब्दांवर आणि ओळींवर विचार करणं सुरु होतं.. अशी जुनी गाणी किती वेड लावणारी असतात.. प्रत्येक वेळी नवी अनुभुती, आणि वर्तमान परिस्थिती नुसार नवाच अर्थ देतात.. स्वतःला त्या गाण्यात हरवून बाहेर संथ पाण्याकडे बघत आयुष्याबद्दल विचार सुरु होतो.. नकळतच.. कुठल्याही आठवणी, संदर्भ नसतांनाही मनात गर्दी करत जातात... अशी शांतता सुखावून आणि कधी दुखावुनही जाते... पण तो आवाज, तो बेफिकीर जगण्याच्या अनुभवातून शिकत आलेला सुर, आतून हलवून जातो... कोई सब जिते सब कोई हार दे म्हणत स्वतःची समजूत काढून घेतो...
आणि शेवटी म्हणतोच, अपनी तो हार है यार मेरे.. आणि आपणही त्याच्या सुरात हरवूनच जातो...

बुधवार, ९ मे, २०१८

कधीतरी

कधीतरी अचानक अस्वस्थ वाटायला लागतं काहीही नसतांना…
कुठले कुठले विचार मनात उगाचंच फेऱ्या घालत असतात…
काही मागचे विचार तर काही येणाऱ्या आयुष्यातील घडामोडींबद्दल भीती…
काहीशी भीती आपण टाकत असलेल्या नवीन पाउलाबद्दल,
तर काही विचार कुणालातरी दुःखात पाहूनही येतात…
कधीतरी आपल्या एकदम सुरळीत चाललेल्या जीवनाबद्दलही एक प्रकारची चीड यायला
लागते
कुठल्याच गोष्टींनी मग हे मन नावाचं पप्रकरण शांत होत नाही…
कुठल्याश्या आपल्या चुका, स्वतःवरच उलटलेले आपले काही ठामपणे घेतलेले निर्णय,
कुणाचेतरी अगदी आपल्याही नकळत दुखावलेले मन
आणि कुणीतरी मोठ्याने रागावलेले क्षण…
गुंताच गुंता होतो विचारांचा…
कुठेले कुठले विसंगत विचार एकाच वेळी आपल डोक उठवत असतात...
त्याच वेळी आपण कुणाला परत नकळत दुखावतो...
आणि अगदी त्याच वेळी, पुढच्या वेळेच्या आपल्या विचारांना नकळतच खाद्य मिळालेल
असतं…

व्यक्ती वाचन

माणसांना वाचण्याची सवय खरंतर ना खूप चांगली असते 
म्हणजे बघा ना आपल्याकडे नेहमीच पुस्तकं असणारंच जरुरी नाही, गाणीही ऐकून ऐकून कितीशी ऐकणार?
कानाला थोडा तरी आराम हवा असतो… मग असं एकट असल्यावर तो एकांत खायला लागतो आपल्याला 
अश्यावेळी एक हमखास मनोरंजन करू शकणारी अशी गोष्ट म्हणजे व्यक्ती वाचन… 
असंख्य प्रकारच्या व्यक्ती आपण बघतो रोज… त्यांना पारखणे म्हणजे बुद्धीला खाद्यचं… 
पण यातही एक नियम आहेच, डोक्यात कुठल्याच मोजमापाच्या पट्ट्या नकोत. त्यांना फक्त वाचायचंय, परीक्षा नाही घ्यायचीय त्यांची.
(व्यक्ती चांगला किंवा वाईट हे सहवासातून कळत, पहिल्या भेटीतून फक्त एक आढावा घेता येतो, आणि ही तर भेटही नाहीये तर मोजमाप नको… )
मग थोड्या वेळाने आपल्याला त्यांना पारखायला मजा येत जाते, आपण नकळत आपल्या वागणुकीशी त्यांना जुळवायला लागतो.
मध्येच हसायला पण येतं आणि वाटत आपणही असंच जोकर दिसत असणार…
काहींच्या हालचालीतून वागणुकीतून शिकायलाही मिळतं आणि काहींच्या चेहऱ्यावरून दुःखाची आणि वेदनेची झलक बघायला मिळते…
काहींकडे बघून आनंद होतो तर काहींकडे बघून आपण किती भाग्यवान आणि सुखी आहोत ते कळत…
पण प्रत्येक जण वेगळा, हटके असतो… कुठल्याही दोन व्यक्तीत साम्य नाही जाणवणार (अर्थात जुळे असल्यास भाग वेगळा)
हालचाली बघण्यात वेळ कसा निघून जातो कळतही नाही… ट्रेन किंवा मॉल मध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी एकटे असल्यावर हमखास सोबतीला असणारी मस्त अशी गोष्ट…व्यक्ती वाचन…

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

टिंग

आत्ता कुठे सगळे आवाज थांबले... निरव शांतता... हृदयाचे ठोके कानांनी मोजता यावे इतकी शांतता... पण तिला ते ही ऐकायचे नव्हते किंबहुना तिला ऐकूही येत नव्हते इतकी ती त्या शांततेच्या कुशीत दडली... तिला किती दिवसांपासून ह्या अश्या शांततेची गरज होती आणि आता ती मिळाली..
अनिता... खूप सुरेख व्यक्तिमत्व. सुंदर, मनमिळाऊ, नाजूक, खट्याळ असे सारे गुण तिच्यात.. तिला सगळ्यांशी संपर्कात राहायला आवडतं. सारखं कुणाशीतरी बोलत राहायचं.. मैत्रीणी, शेजारी, कामवाली बाई किंवा अगदी दुकानदाराशीही ती तासंतास बोलू शकेल इतकी बोलकी... गाणी, पुस्तकं, बागकाम, स्वयंपाक ह्यांनी तिचं आयुष्यं परिपूर्ण झाल्यासारखं वाटतं तिला.. ती जिवंत ठेवते घराला...
तिला आठवली ती रविवार ची निवांत सकाळ... अनिल गॅलरीत नेहमीप्रमाणे पेपर वाचत बसलेला आणि अनिता समोरच्याच खुर्चीत मोबाईल मध्ये रमलेली.. अनिल आणि अनिताच्या रविवारी खूप गप्पा रंगायच्या. दोघेही निवांत असायचे. तोही बोलण्यात तिच्या तोडीस तोड होता तरीही तो अनिताला बोलला- "तुझ्या बरोबर असताना माझी बोलण्याची कला हरवून ऐकण्याची कला जोपासल्या जात आहे", त्यावर ती फक्त गोड लाजली... त्यात मुलाने मोबाइल वर सुट्टीसाठी भारतात येणार कळवलं ते ऐकून दोघेही खुश... कळताक्षणीच तिची दिवसांची मोजणी सुरु झाली...
अनिताला आताशा नवीन टेकनॉलॉजी वापरून बघण्याचा नवा छंद जडला होता. ती फार वाचायची त्याबद्दल. टेकनॉलॉजी चा उपयोग काय, वापर कसा करायचा, किंमत किती असं सारं काही. त्यात मोबाईलचीही भर पडली. तिला फार आवडायचा वापरायला. त्यात असलेल्या साऱ्या गोष्टी तिने वापरून पहिल्या. मोबाईल आल्यावर तिचा संवाद आणखीच वाढला..
मुलाला तिची आवड निवड कळालेली म्हणून परदेशातून आई साठी एक वेगळीच जादू आणली त्याने. होय, तिच्यासाठी जादूच कारण तिने हा प्रकार आधी कधीच पाहिलेला किंवा ऐकलेला नव्हता. ती एक नवीन टेकनॉलॉजी होती जी भारतात अजून आलेली नव्हती. तिला ही जादू वापरायला मिळणार होती. अजब किमया होती... खूप आकर्षक आणि आजवर ऐकण्यात आलेल्या शोधांपेक्षा निराळी... तिला एवढं अचंबित होताना अनिल बऱ्याच वर्षांनी बघत होता..
हातावरच्या घड्याळीत अपडेट्स बघणे, संदेश वाचणे ही सर्वसामान्य बाब झाली होती, आता तिला सगळं काही डोक्यात वाजणाऱ्या एका "टिंग" ने कळणार होतं. ती अगदी भारावून गेली.. असा काही शोध लागेल ह्याची ती कल्पनाच करू शकत नव्हती. तिने लगेच इन्स्टॉल करण्यास होकार दिला.
अलीकडे अनिताला लागलेल्या मोबाईल च्या वेडाने अनिल काळजीत बुडालेला. खरंतर मोबाईलशी ओळख होताच ती त्यात गुंतत गेली, तो हातातून सुटेनासा झाला.. आता तर तिचा आनंद अगदी टोकावर पोहोचलेला... तिचं मन वळवण्याचा तो सतत प्रयत्न करायचा. मोबाईल मध्ये कमीत कमी व्यस्त व्हावी म्हणून तिला वेळात वेळ काढून बाहेर फिरायला घेऊन जा, नव्या नव्या घडामोडींबद्दल चर्चा कर हा त्याचा प्रयन्त चाललेला होता.. कामांमधून फुरसत मिळाली की मुलांसोबत गप्पाही रंगायच्या, पण मोबाइलचं वेड वाढत चाललेलं. सतत स्वतःला सजवायचं, फोटोस काढायचे, नवे कपडे, नवं सारं काही... सोबतीला नवीन गॅझेट रेडी होतंच. सर्वांहून वेगळं गॅझेट आणि नवीन टेकनॉलॉजि म्हणून मिरवायला लागली.... मैत्रिणीही सारख्या कौतुक करायच्या, विविध लोकं विचारायला यायचे, तिला बऱ्याच ठिकाणी परीक्षणाला बोलावणं यायचं, सोशल मीडिया वर जाहिराती ह्या साऱ्या प्रसिद्धीने तिला आणखीच हुरूप यायचा...
"तुला आठवतंय अनु, कित्ती छान पत्रं लिहायचीस तू? तुझ्या पत्रांमध्ये सगळ्या घडामोडी जिवंत करायचीस.. पत्रातल्या अक्षरांकडे आणि नेटकेपणाकडे बघतच राहावसं वाटायचं..."
"आता वेळच कुठे मिळतो रे कामांमधून, सगळं आवरायला वेळ लागतो आणि मग मैत्रिणींच्या गप्पांमध्ये भाग घ्यावा लागतो नाहीतर मी अपडेटेड कशी काय राहील?"
"अगं पण त्यांच्या गप्पांचं काय एवढं? तुला स्वतःकडे वेळ द्यायला हवा ना?"
"अरे त्यांच्या गप्पा ऐकण्यात गम्मत वाटते, नेहमीच आम्ही एकमेकींबद्दल बोलत नाही हां! बरंच नवनवीन शिकायला मिळतं.. शिवाय फेसबुक आहेच की अवांतर बातम्या द्यायला.. आणि youtube वर तर भडीमार आहे ज्ञानाचा!!"
"ह्यातलं तू किती ज्ञान घेतेस आणि उरलेला वेळ कुठल्या गोष्टींत घालवतेस? तू विसरलीस कदाचित, सकाळचं वर्तमानपत्र वाचल्याशिवाय तुझा दिवस सुरु व्हायचा नाही, एकेक पान वेगळं आणि संपूर्ण घडी विस्कटलेलं.. आणि आता ते दाराच्या कडीवरून खालीही उतरत नाही... तू स्वतःला अपग्रेड करत नसून डाऊनग्रेड करत आहेस हे कळतंय का तुला?"
"बरं बाबा उद्यापासून वर्तमानपत्र वाचणार."
"हे बघ, तुझ्या दिनक्रमात ढवळाढवळ करण्याचा माझा उद्देश नाही पण तुला एक सल्ला आहे, सगळं आधुनिक आणि नवीन अनुभवण्याच्या नादात तू पूर्वीचं समृद्ध जगणं विसरू नकोस अगं! हे मायाजाळ आहे, क्षणिक आनंद देणारं... "
अनिता त्याच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करायची. अनिलही मग तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष करून कामात बुडवून घ्यायचा स्वतःला... त्यांच्यातले मतभेद वाढतच गेले.. तिने स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा निर्णय घेतला, पूर्वीची अनिता आता बदलून गेली. नावे छंद, नव्या सवयी, नव्या मैत्रिणी, नवीन जीवनपद्धती.. सगळं तिला वाटेल तसंच..
अनिताने नवीन टेकनॉलॉजि अपडेट केल्याला ३-४ महिने उलटून गेले.. आता सगळं सवयीचं झालेलं.. कुठलंही नोटिफिकेशन आलं की "टिंग" कॉल आला कि "रिंग" . आता ह्या "टिंग" आणि "रिंग" ची सवय जडली. सतत सोशल मीडिया चा वापर, आता चटक लागली या साऱ्याची... कुणालाही क्षणाचा विलंब न करता उत्तर द्यायचं आणि परत उत्तराची प्रतीक्षा करायची.. सगळं मजेत, तिच्या धुंदीत होती ती... तिचा दिवस कसा संपायचा हे तिलाही कळायचं नाही...
महिने उलटून जात होते सगळं तिच्या मनाप्रमाणे होत असून सुद्धा आता तिला वैताग येऊ लागला. गरज नसतानाही मोबाईल बघण्याची सवय ही सवय नसून बळजबरी होऊ लागली. निर्णय तिचा असल्याने कुणाला बोलताही यायचं नाही. शांतता हवी होती तिला पण सारखं डोक्यात "टिंग" वाजायचं, झोपमोड होऊ लागली म्हणून ती चिडचिडी होऊ लागली, सतत निराशा, नकारात्मक विचार, आणि टोकाला जाणारे विचार.. घरच्यांनाही कळू लागलं पण ती संभाषणाला नकार देत एककेटी राहू लागली. तिला हा बदल प्रकर्षाने जाणवू लागला पण आता पूर्वीची अनिता होणे शक्य नाही हे तिलाही कळून चुकलं..
ती आता जुन्या आठवणीत रमायला लागली... संवाद स्वतःबरोबरच होऊ लागला आणि नैराश्य आयुष्य पोखरू लागलं. स्वतःच्या वागण्याचा तिला पश्चाताप व्हायला लागला.. अनिलला तिचं मन कळलं. तो तिला जपायला लागला. तत्पर होऊन तिच्या सगळ्या आजारांची तपासणी करायचा, हवं नको ते बघायचा.. खूप काळजी घ्यायचा.. पण तिच्या मनातील आणि डोक्यातील वेदना असह्य झाल्या.
मुलाने प्रेमाने आणलेली भेट.. ती टेकनॉलॉजि अनइंस्टॉल होणार नाही हे माहिती होतं. त्याने गम्मत म्हणून आणलं असून फक्त जवळ ठेवायला, अभ्यासाला आणलं असल्याचं आधीच बजावलेलं असतानाही अनिताने ते हट्टाने इंस्टाल केलं.. आता काहीच शक्य नव्हतं... सुरवातीला जेवढ्या उंचीवर आनंद होता आता तेवढाच खाली आला.. विचार करत रात्र झाली आणि तिचा डोळा लागला...
आता सगळं शांत होतं... कशाचाच आवाज नाही. रात्र आहे म्हणून कादाचित सगळं शांत आहे, ती शांततेचा उपभोग घेत होती... तेवढ्यात मोबाईल चा मंद प्रकाश खोलीत पसरला.. "टिंग" न वाजता.. तिला आश्चर्याचा धक्का बसला.. तिचं शरीर निपचित पडून होतं, शांतता चेहेऱ्यावर पसरलेली... आता परत जाग येणे नाही, ते "टिंग" नाही, विचारांचा गुंता नाही, नैराश्य नाही आणि मोबाईल? तो तर नाहीच नाही... आता फक्त शांतता, हवीहवीशी, जिवंतपणी ज्या साठी मन आसुसलेलं ती शांतता...

गुरुवार, ५ एप्रिल, २०१८

समुद्र

समुद्र.. 
तळाशी शांत आणि वरून खवळलेला समुद्र, लाटांच्या तालावर लहरणारा समुद्र, अथांग आणि त्या बरोबरच सुंदर समुद्र... 
पोटात दडवलेला खजिना अगदी शांत. वाऱ्याच्या प्रवाहाने लाट येऊन वरचे पापुद्रे तेवढे एक एक काढत जाते. वरवर वाऱ्याला तो कितीही मुभा देत असला तरीही आतलं अस्तित्व हलवू देत नाही, समुद्र आत थांगपत्ता न लागू देता वरचेवर त्याच्याशी लढत असतो... 
त्याच्या पुढ्यात जाताच स्वच्छ आणि कोऱ्या पाटीसारखं मन होऊन जातं. आयुष्यातल्या घडामोडी किती छोट्या आणि हा असा थेट समोर उभा असलेला समुद्र कित्ती मोठ्ठा असं वाटतं... सर्वत्र पाणी, किनारा काय ते माहिती नसणारं... चित्रकार पानांवर मनसोक्त रंग उधळून देतो आणि तो सर्वत्र पसरतो तसं चोहोबाजूंनी पसरलेलं पाणी... सूर्योदय आणि सूर्यास्ताला रंगांचा आणि प्रकाशाचा उत्सवच...
अस्तित्व असावं तर समुद्र सारखं.. क्षणा-क्षणाला जाणीव करून देणारं, बाहेरील वादळं कितीही उध्वस्त करणारी असली तरीही स्वतःच्या आतल्या मनाला धक्काही न लागू देणारं..
आपण काही काळ स्वतःला विसरून बघत असतो त्याचा थाट, त्याचं ओरडणं, शांत होणं, किरणांनी चकाकणं आणि त्याचं बेधुंद होणं...
बेभान वाहणाऱ्या वाऱ्याला अंगावर झेलत, त्याच्या आवाजाने शांततेत मिसळलेला विशिष्ट आवाज ऐकत आणि त्याच्या फेसाळणाऱ्या लाटांचा पायांना स्पर्श होताच आनंदून जाणारं मन आणि पाऊलं घेऊन आपण परत फिरतो...
परतीच्या वेळी पुन्हा एकदा त्याला वळून त्याचं विशाल अस्तित्व आणि मनात दाटलेली शांतता फक्त सोबत असते...

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...