आपलं घर… ज्यात खेळून बागडून आपण लहानाचे मोठे झालेलो असतो ते घर… घरातली एक एक वस्तू, त्यातला प्रत्येक कोपरा, भिंती, खिडक्या दरवाजे, अंगण, झाडं सुद्धा आपल्याला ओळखून असतात.. आपल्याला भेटताच ओळखीचं हसतही असतील ही सारी मंडळी कारण त्यातल्या प्रत्येकासोबत आपली वेगळी गुपितं आणि वेगवेगळ्या आठवणी असतात...
कुठेतरी वाचलेलं आठवतंय की "घर म्हणजे चार भिंती आणि एक छत एवढंच नाही तर त्यात एक वास्तुदेवताही वास करत असते"… अगदी खरंय, तिचा आशीर्वाद असतोच नेहमी पाठीशी आणि जर घराला जीव असता तर त्याने आलिंगनच दिलं असतं प्रत्येक भेटीत आणि लाडही केले असते भरपूर...
घरापासून दूर जाताना त्यातल्या प्रत्येक गोष्टी आठवत असतात…आपल्या चिमुकल्या पावलांनी चालायला शिकलो ते घर, ज्या उंबरठ्यावर अक्षरं गिरवत लिहायला शिकलो ते घर, जिथल्या भिंतींबरोबर टक्कर होऊन दुखापत झालेली असते ते घर, जिथल्या जिन्यावर, गच्चीवर आणि आसपास लपंडाव खेळलेलो असतो ते घर, जिथे रडलो, भांडलो, भरपूर हसलो, आणि नात्यांना भरभरून जगलो ते घर… कित्येक कडू-गोड क्षण, समारंभ, सारे सण, उन्हाळे-पावसाळे सगळे येथूनच तर अनुभवलेले असतात...
घरातली लोकं जेवढी हवीहवीशी वाटतात तेवढाच घरावरही जीव असतो आपला आणि ते जाणवतही नेहमी. ह्याची एक तुलना करायची झाली तर जेव्हा बाहेर भेट होते तेव्हाचा आनंद आणि त्यांनाच घरी भेटतो तो आनंद यात फार फरक आहे, कारण त्यात घरचे लोक तर असतात पण घर नसतं…
आपल्याला जेवढा घराचा जिव्हाळा असतो तेवढाच घरालाही असतो... त्यालाही आपली आठवण येते... कधीही घरी गेल्यावर तोच विशिष्ट सुगंध, आपुलकीचे मंद वारे, प्रत्येक हालचालीत होत असलेला ओळखीचा भास आणि निरीक्षणात आढळलेला घरातला थोडा बदल... वाटतं की घर प्रेमाने मिठीत घेतंय आपल्याला… आपल्यातला बदल जसा घरच्यांना कळतो तसाच घरातला बदलही लगेच कळतो आपल्याला आणि जाणीव होते की बदल त्यालाही हवा होता… तरीही घरात जुन्याच्या खाणाखुणा शोधतोच आपण, कारण त्यांना आपल्या आठवणीही बिलगलेल्या असतात…
असं घराचं घरपण, हवहवसं वाटणारं आणि नेहमी साद घालणारं…
वाचनाचा अर्थ लावायचा तर ओळींच्या मधील रिकाम्या जागा वाचाव्यात असं म्हणतात... अक्षरं आणि रेषांच्या मदतीने मनातलं काही लेखणीत उतरवण्याचा हा फक्त एक छोटासा प्रयत्न...
गुरुवार, ३१ मार्च, २०१६
घर
शुक्रवार, १८ मार्च, २०१६
नदी
खळखळ वाहणाऱ्या प्रवाहाने जन्म घेणारी नदी… स्वतःच्या मनाप्रमाणे मनसोक्त वाहणारी... पाण्याचा एका लयीत आवाज करत, नागमोळी वळणं घेत ती निघते एका लांब प्रवासाला… कधी संथ वाहत तर कधी रुद्र रूप धारण करून वाटेत येणाऱ्या प्रत्येक वस्तूला उध्वस्त करत जाणारी… नदी म्हणजे समृद्धीचं प्रतिक, ती आसपासच्या परिसराला समृद्ध करत पुढेच पुढे जात असते आणि त्याची ग्वाही तो परिसरही देत असतो…
उन्हाळ्यात मात्र तिच्या सौंदर्याला उतरती कळा येऊ लागते. तिचं भव्य पात्र पाण्याविना भकास वाटू लागतं. सारी सृष्टी जेथे सूर्याच्या प्रखर तेजाने तापलेली असते तेथे नदीचं पाणीही वाफ होणारंच. एखाद्या गर्भश्रीमंत माणसावर गरीबीचे दिवस बघण्याची वेळ यावी तशीच स्थिती नदीचीही होते…
एकेकाळी खळखळ वाहणारं पाणी कुठल्याश्या डबक्यात निपचित पडलेलं असतं… मोठमोठे खडक, काही लहान मोठ्या आकारात तयार झालेले तळे, नव्याने उगवलेली झाडी, किनाऱ्यावर ओळीने लावलेल्या होड्या, रात्री पेटवलेल्या शेकोट्यांचे अवशेष, खूप तापणारा सुर्य आणि सर्वत्र पसरलेली वाळू… कधीकाळी असलेल्या श्रीमंतीची आठवण काढत ह्या सगळ्या वस्तू उन्ह अंगावर घेत असतात…
नदी अश्या वेळी गजबजलेली नसतेच. ह्या शांततेत एखादा आशावादी मच्छिमार त्यातल्याच एका मोठ्या डबक्याच्या काठावर बसलेला, किनाऱ्यावर फिरणारे प्राणी, थोड्याक्याच का असेना पण पाण्यात उड्या मारणारी किंवा वाळूत खेळण्यात मग्न असलेली आसपासची काही उनाड मूलं, कधी कधी अस्थि विसर्जन करण्यास आलेला ५ - ६ लोकांचा समूह, झाडांच्या थंड सावलीत विसावलेली लोकं, दुपारचा विरंगुळा म्हणून काही गावकरी पत्यांचा फड रंगवत झाडाच्या आडोश्याला बसलेली आणि कधी नदीच्या निर्मनुष्य जागेचा आसरा घेऊन भटक्या आणि फिरस्ती वर असलेल्या लोकांनी आपलं बिऱ्हाड बसवलेली…
उन्हाळ्याचा प्रभाव असला तरीही नदीची भव्यता कमीही होत नाही, तिच्या बाजूने जाणारी किंवा तिच्यावर बांधलेल्या पूलावरून प्रवास करणारी वर्दळ जाताना तिच्याकडे डोळे भरून बघते, तेथे वाहणारी थंड हवा अंगावर घेत दूर पर्यंत तिचं दर्शन घेते, आणि मनात तिच्या पाणी भरलेल्या पात्राची आठवण काढत समाधानाने पुढे जाते कारण नदी पुन्हा एकदा भरणार असते, परत जुने दिवस नव्याने येणार असतात आणि समृद्ध होऊन ती परत एकदा वाहणार असते… मागचे सगळे दिवस विसरून ती पुन्हा जगणार असते…
सरस्वती पूजन
आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...
-
चालता चालता कुणाचा तरी थकलेला आवाज कानी आला... "फारच दमायला झालंय का ग तुला? थोडा श्वास तर घे, एवढ्या घाईत चालायला काय झा...
-
शाळांचा सांस्कृतिक कार्यक्रम… एक आनंदाची, उत्साहाची लहर… शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी वर्ग सगळेच त्यात उत्साहात सहभाग घेतात. लहान...
-
आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...