सोमवार, २८ मे, २०१८

सच मेरे यार है..

लोकल ची गर्दी आणि गोंगाटात एक शांतता भरून आणणारा पूल, तो समुद्रावरून जाणारा, दोन स्टेशनांना जोडणारा पूल.. 
अरबी समुद्रावरून वाहणारा वारा, ते सर्वत्र पसरलेलं शांत पाणी, अंधारातही दिसणारं.. प्रकाश पडला की चकाकणारं.. 
त्या पाण्याकडे आणि समुद्राच्या विशाल पात्राकडे बघून मन कुठेतरी हरवून जातं.. कानातल्या हेडफोन्सवर जुन्या गाण्यांची प्लेलिस्ट वाजत असते आणि नजर त्याच्यावर खिळलेली असते... 
खरतंर त्याच्या कडे नजर वळताच आजूबाजूला चाललेल्या गोंगाटाचा फरक पडेनासा होतो.. गर्दीही काहीशी शांत होऊन बाहेर बघत असते..  
अश्या वेळी कधी आवडीचं सागर चित्रपटातलं गाणं सुरु होतं... 
सच मेरे यार है, बस वहीं प्यार है 
जिसके बदल मी कोई तो प्यार दे,  
बाकी बेकार है... यार मेरे... यार मेरे... 
आणि त्याच्या प्रत्येक शब्दांवर आणि ओळींवर विचार करणं सुरु होतं.. अशी जुनी गाणी किती वेड लावणारी असतात.. प्रत्येक वेळी नवी अनुभुती, आणि वर्तमान परिस्थिती नुसार नवाच अर्थ देतात.. स्वतःला त्या गाण्यात हरवून बाहेर संथ पाण्याकडे बघत आयुष्याबद्दल विचार सुरु होतो.. नकळतच.. कुठल्याही आठवणी, संदर्भ नसतांनाही मनात गर्दी करत जातात... अशी शांतता सुखावून आणि कधी दुखावुनही जाते... पण तो आवाज, तो बेफिकीर जगण्याच्या अनुभवातून शिकत आलेला सुर, आतून हलवून जातो... कोई सब जिते सब कोई हार दे म्हणत स्वतःची समजूत काढून घेतो...
आणि शेवटी म्हणतोच, अपनी तो हार है यार मेरे.. आणि आपणही त्याच्या सुरात हरवूनच जातो...

बुधवार, ९ मे, २०१८

कधीतरी

कधीतरी अचानक अस्वस्थ वाटायला लागतं काहीही नसतांना…
कुठले कुठले विचार मनात उगाचंच फेऱ्या घालत असतात…
काही मागचे विचार तर काही येणाऱ्या आयुष्यातील घडामोडींबद्दल भीती…
काहीशी भीती आपण टाकत असलेल्या नवीन पाउलाबद्दल,
तर काही विचार कुणालातरी दुःखात पाहूनही येतात…
कधीतरी आपल्या एकदम सुरळीत चाललेल्या जीवनाबद्दलही एक प्रकारची चीड यायला
लागते
कुठल्याच गोष्टींनी मग हे मन नावाचं पप्रकरण शांत होत नाही…
कुठल्याश्या आपल्या चुका, स्वतःवरच उलटलेले आपले काही ठामपणे घेतलेले निर्णय,
कुणाचेतरी अगदी आपल्याही नकळत दुखावलेले मन
आणि कुणीतरी मोठ्याने रागावलेले क्षण…
गुंताच गुंता होतो विचारांचा…
कुठेले कुठले विसंगत विचार एकाच वेळी आपल डोक उठवत असतात...
त्याच वेळी आपण कुणाला परत नकळत दुखावतो...
आणि अगदी त्याच वेळी, पुढच्या वेळेच्या आपल्या विचारांना नकळतच खाद्य मिळालेल
असतं…

व्यक्ती वाचन

माणसांना वाचण्याची सवय खरंतर ना खूप चांगली असते 
म्हणजे बघा ना आपल्याकडे नेहमीच पुस्तकं असणारंच जरुरी नाही, गाणीही ऐकून ऐकून कितीशी ऐकणार?
कानाला थोडा तरी आराम हवा असतो… मग असं एकट असल्यावर तो एकांत खायला लागतो आपल्याला 
अश्यावेळी एक हमखास मनोरंजन करू शकणारी अशी गोष्ट म्हणजे व्यक्ती वाचन… 
असंख्य प्रकारच्या व्यक्ती आपण बघतो रोज… त्यांना पारखणे म्हणजे बुद्धीला खाद्यचं… 
पण यातही एक नियम आहेच, डोक्यात कुठल्याच मोजमापाच्या पट्ट्या नकोत. त्यांना फक्त वाचायचंय, परीक्षा नाही घ्यायचीय त्यांची.
(व्यक्ती चांगला किंवा वाईट हे सहवासातून कळत, पहिल्या भेटीतून फक्त एक आढावा घेता येतो, आणि ही तर भेटही नाहीये तर मोजमाप नको… )
मग थोड्या वेळाने आपल्याला त्यांना पारखायला मजा येत जाते, आपण नकळत आपल्या वागणुकीशी त्यांना जुळवायला लागतो.
मध्येच हसायला पण येतं आणि वाटत आपणही असंच जोकर दिसत असणार…
काहींच्या हालचालीतून वागणुकीतून शिकायलाही मिळतं आणि काहींच्या चेहऱ्यावरून दुःखाची आणि वेदनेची झलक बघायला मिळते…
काहींकडे बघून आनंद होतो तर काहींकडे बघून आपण किती भाग्यवान आणि सुखी आहोत ते कळत…
पण प्रत्येक जण वेगळा, हटके असतो… कुठल्याही दोन व्यक्तीत साम्य नाही जाणवणार (अर्थात जुळे असल्यास भाग वेगळा)
हालचाली बघण्यात वेळ कसा निघून जातो कळतही नाही… ट्रेन किंवा मॉल मध्ये किंवा गर्दीच्या ठिकाणी एकटे असल्यावर हमखास सोबतीला असणारी मस्त अशी गोष्ट…व्यक्ती वाचन…

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...