लोकल ची गर्दी आणि गोंगाटात एक शांतता भरून आणणारा पूल, तो समुद्रावरून जाणारा, दोन स्टेशनांना जोडणारा पूल..
अरबी समुद्रावरून वाहणारा वारा, ते सर्वत्र पसरलेलं शांत पाणी, अंधारातही दिसणारं.. प्रकाश पडला की चकाकणारं..
त्या पाण्याकडे आणि समुद्राच्या विशाल पात्राकडे बघून मन कुठेतरी हरवून जातं.. कानातल्या हेडफोन्सवर जुन्या गाण्यांची प्लेलिस्ट वाजत असते आणि नजर त्याच्यावर खिळलेली असते...
खरतंर त्याच्या कडे नजर वळताच आजूबाजूला चाललेल्या गोंगाटाचा फरक पडेनासा होतो.. गर्दीही काहीशी शांत होऊन बाहेर बघत असते..
अश्या वेळी कधी आवडीचं सागर चित्रपटातलं गाणं सुरु होतं...
सच मेरे यार है, बस वहीं प्यार है
जिसके बदल मी कोई तो प्यार दे,
बाकी बेकार है... यार मेरे... यार मेरे...
आणि त्याच्या प्रत्येक शब्दांवर आणि ओळींवर विचार करणं सुरु होतं.. अशी जुनी गाणी किती वेड लावणारी असतात.. प्रत्येक वेळी नवी अनुभुती, आणि वर्तमान परिस्थिती नुसार नवाच अर्थ देतात.. स्वतःला त्या गाण्यात हरवून बाहेर संथ पाण्याकडे बघत आयुष्याबद्दल विचार सुरु होतो.. नकळतच.. कुठल्याही आठवणी, संदर्भ नसतांनाही मनात गर्दी करत जातात... अशी शांतता सुखावून आणि कधी दुखावुनही जाते... पण तो आवाज, तो बेफिकीर जगण्याच्या अनुभवातून शिकत आलेला सुर, आतून हलवून जातो... कोई सब जिते सब कोई हार दे म्हणत स्वतःची समजूत काढून घेतो...
आणि शेवटी म्हणतोच, अपनी तो हार है यार मेरे.. आणि आपणही त्याच्या सुरात हरवूनच जातो...