हा एकटेपणा अंत बघतोय माझा. माणसाने किती एकटे असावे यालाही मर्यादा असायला हव्या, एका ठराविक कालावधी नंतर आपसूकच त्याच्या भोवती माणसांच वलय निर्माण व्हायला हवं जेणेकरून त्याला जग थोडं माणसाळलेलं वाटेल...
कसं असतं बघा ना, आपल्या सभोवती सतत माणसांचा गोंधळ असतोच, कारण गर्दी आणि माणसं नसणाऱ्या जागा आता फारश्या शिल्लक नाहीत.. पण माणसं आणि मित्र किंवा ओळखीचे चेहेरे यात फरक आहे ना?
गर्दीमुळे किंवा सभोवतालच्या माणसांमुळे एकटेपणा कमी झाला असता तर या जगात कुणीच एकटेपणाचा बळी ठरला नसता, पण हे ही शक्य नाहीच. एका ठराविक वयानंतर आपण क्वचितच झपाट्याने मैत्री करतो, कारण वयानुसार आवडी निवडी आणि सहवासाची परिभाषा बदलत जाते, आपण जागरूक व्हायला लागतो आणि आपले विचार ज्यांच्याशी पटतात त्याच व्यक्तींना आपण आपल्या आयुष्यात डोकावण्याची संधी देतो, अन्यथा हा एकटेपणा जास्त आपुलकीचा आणि सुरक्षित वाटतो...
बरं एकटे असूनही आपण स्वतःशी बोलत असतोच तर एक मित्र तर मिळालेला असतो पण त्या मित्रालाही एकाच मित्राचा कंटाळा आलेला असतो आणि दुसऱ्या व्यक्तीशी ओळख करण्याची इच्छा जास्त तीव्र होत जाते. रोजचं तेच सकाळी उठणं, तयार होणं ( ते ही नाईलाजाने, कारण आपल्याला बघायला कुणी खास व्यक्ती वाट बघणारा नसतो ), ऑफिस, काम, जेवण, सुट्टी, सगळं सुरळीत चालू, पण काही विशेष नसणार त्यात काही, ऑफिस ची तीच रोजची लोकं, त्याच त्या गप्पा आणि तेच परत दुसऱ्या दिवशीही, तेवढा वेळ निघून जाणार आणि कळणारही नाही कसा गेला पण खरी गम्मत तर नंतर सुरु होते, घरी गेल्यानंतरचा एकटेपणा, सुट्टीच्या दिवशीचा एकटेपणा, सगळीकडे पसरलेला फक्त एकटेपणा...
--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा