जेव्हा जेव्हा मी स्वतः बद्दल विचार करते तेव्हा वाटते की मी खूप भाग्यवान आहे…
मला सगळं जेव्हाच्या तेव्हा मिळालंय,,, किंवा अस म्हणू शकते की जेव्हा गरज आणि योग्य वेळ होती तेव्हा सगळं काही मिळत गेलं…
कधी कशाची उणीव नाही भासली (जे आहे त्यात समाधानी राहण्याची शिकवणही मिळत गेली)… कधी कुठल्या एका गोष्टीसाठी रडत नाही बसावं लागलं…
समजूतदार पालक मिळाले… मी कधीही आई आणि बाबांना सारखं भांडताना नाही पाहिलं… ते नेहमी एकमेकांना समजून पुढे जात राहिले आणि त्यांच्या वागणुकीतून आम्हाला शिकवण देत राहिले…
शाळेतही कधी भीती नाही वाटली, दांड्या मारण्याची इच्छा नाही झाली कधी, शिक्षकाची, अभ्यासाची किंवा कशाचीच भीती नव्हती…
माझं जग खूप सुरक्षित होत, खूप श्रीमंत होतं (वागणूक, शिकवण, लोक ह्यांच्या मुळे)... माझ्या आजूबाजूची लोक, शेजारी, मित्र- मैत्रिणी, अगदी शेजाऱ्यांचे नातेवाईक, त्यांचे शेजारी सगळ्यांची खूप खूप सोबत आणि खूप प्रेम मिळालं…
कधी आईचा मार खाल्ला किंवा बाबा रागावले की शेजारच्या काकूंकडे हक्काने रडत जाता यायचं आणि मग त्यांनी प्रेमानी समजूत काढायची आणि घरी गेल्यावर आईच्या डोळ्यातले प्रेमळ भाव बघायला मिळायचे…
मला मिळालेल्या प्रत्येक बक्षीसाच पूर्ण कॉलोनी मध्ये झालेलं कौतुक…
शेजारच्या ताई, दादाच्या लग्नाचे पाहुणे आमच्याकडे आरामात राहिलेले आणि आम्हीही यजमानाचे कर्तव्य आनंदाने निभावलेले… घर फार छोट होत पण मनं फार मोठी होती. कधीही कितीही जास्त पाहुण्यांसाठी जागा कमी पडली नाही.…
शिकता शिकता सभोवतालचे प्रश्नही डोळ्यास पडत गेले आणि माझ्या अनुभवात भर घालत गेले…
सामाजिक बांधीलकी म्हणजे काय आणि मदत करण्याचा धर्म किती मोठा हे सुद्धा अनुभवाने आणि सभोवताली पाहिलेल्या दायाभावाने कळत गेलं… खूप खूप पुस्तकं वाचायला मिळाली…
वाचनालयात दर आठवड्याला एक तास फेरी, बागेत जायचं…
कितीतरी कॅम्पस, सहली, अभ्यासा व्यतिरिक्त खूप काही शाळेने दिलेले अनुभव…
सगळचं सभोवतालच जग सुरक्षित असलेलं, आणि कितीतरी लोक मला खूप काही शिकवून गेलेले…
माझं जग नेहमीच समृद्ध होत या सगळ्यांमुळे आणि आताही आहे …
प्रश्न हाच पडतो की हे असच समृद्ध आणि सुरक्षित जग मी माझ्या मुलांना देऊ शकणार का??
आताच्या बदलत्या जगात जिथे आपलेच शेजारी कोण हे माहित नसतं तिथे त्यांच्या जगातल्या लोकांशीही काही संबंध नाही येणार…
कसं सांगणार माझ्या मुलांना की एक घास सगळ्यांमध्ये वाटून कसा खातात??? कसं खरं वाटणार त्यांना की शेजारची काकू स्पेशल भाजीची एक वाटी आपल्यासाठी उरवून ठेवते आणि आवर्जून आणून देते… आपल्या इच्छांची, आवडीची काळजीही कुणी घेऊ शकतो, आणि या सगळ्यांचा परीकथेसारखा परिचय द्यावा लागेल बहुदा...
वाईट वाटतंय या गोष्टीचं की पुढे धावण्याच्या शर्यतीत किती मौल्यवान गोष्टींचा आपण ऱ्हास केला आणि कितीतरी गोष्टी ज्यांना अपरिचित ठेवलय आपण पुढच्या पिढीपासून…