हिवाळा संपत आल्याचं जाणवतंय आताशा...
दुपारचं ऊन थोडं जास्तच तीव्र होतंय…
अश्याच वेळी कुठल्याश्या सावलीत उभं राहून किंवा चालताना, काहीतरी आठवतंय, काहीतरी आपल्यापासून खूप दूर दूर जात असल्याची जाणीव होतेय…
कदाचित खूप दूर गेलेले पण खूप काळ आठवणीत असलेले क्षण एकाच वेळी मेंदूच्या कुठल्याश्या कप्प्यात जागे होतायेत….
कदाचित काही भावना नव्याने उमलाताहेत, काय नव काय जुनं काहीच कळत नाहीये…
उन्हाळ्यातली दुपारची वेळ कधीकधी खूप झोपण्यात, कधी खूप अभ्यास करण्यात, कधी कुणासोबत खूप गप्पांमध्ये तर कधी एकाकी घालवलेली…
ती वेळ कधी जाता जात नाही तर कधी गेलेली कळतही नाही…
जाणवतंय काहीतरी हलतंय मनात, जाणवतंय काही क्षण कधीच परत येणारे नाहीत, कदाचित जागा, वेळ, काळ सगळंच बदललंय आणि मागे गेलेले, सोडलेले, सुटलेले क्षण आज काहीतरी करताहेत मनात… कदाचित हे वेळेचं गणित असणार काहीसं कठीण…
आज काहीही करताना, बसताना, उठताना, झोपताना, काहीतरी गुन्हा केल्यासारखं वाटतंय,
वेळ जायलाही वेळ लागतोय आणि वेळ पकडायला सवडही नाही… खूप साऱ्या घटना, प्रसंग, जे उन्हाळ्याशी निगडीत आहेत ते एकदम आठवायला लागलेत…
विपासना, ध्यान, एकाकीपण, अश्रू, शिबीर, आचार्या, स्वतःबद्दल खूप काहीतरी केलेला विचार, शांतता, वेळेचं कळलेलं महत्व, प्रवचन…
घरी आई सोबत घालवलेला वेळ, तिने दुपारच्या विश्रांती नंतर बनवलेला एक एक पदार्थ, चहा, तिच्यासोबत, बहिणीसोबत हसत आणि मजेत असलेले काही क्षण, कधीकधी कुणाची भेट, कधी मारलेला फेरफटका सगळंच आठवतय… कधी घरात बसून किंवा तेच तेच पनाचा कंटाळा येउन आईवर चिडणार आणि तीही हतबल होऊन काही न करू शकल्याच्या अपराधीपनात उभी असणार आणि मग अचानक मन भरून येणार असे कितीसे क्षण…
कधी घरी येणारे आणि काही दिवस राहून जाणारे नातेवाईक निरोप घेऊन जाताना भरून आलेले डोळे, अचानक सुनं सुनं वाटू लागलेलं घर, घरातल्या भिंती दारं सगळं काही एक जाणीव करून देत अश्या वेळी… किती आठवणी, किती व्यक्ती आणि खूप काही आठवतंय घरासोबतच… ते सगळं नव्याने पुन्हा नाही जगता येणार कदाचित ही पण भावना नसेल स्वस्थ बसू देत…
आपण एकाच आयुष्यात किती आयुष्य जगत असतो ना? असं पण असू शकतं की एकच आयुष्य टप्प्या टप्प्याने जगत असतो… एक टप्पा पूर्ण झाला की त्यात पुन्हा मागे वळून परत जाण्याची मुभा नाहीच, तुम्ही फक्त त्या जगलेल्या टप्प्याचे वलय सोबत घेऊन जात असता…
काहीशे उन्हाळे मनावर घाव करूनही गेले आणि सुंदर क्षणही देऊन गेले… आपले वाटणारे लोक अगदी परके भासायला लागलेले, काही व्यक्ती ज्यांचा प्रभाव संपूर्ण आयुष्यावर पडावा असे अगदीच विरुद्ध दिशेला गेलेले आणि स्वतःच्या विचारांवर माझ्या प्रश्नचिन्ह कोरून गेलेले…
खूप काही आठवणी पुन्हा जाग्या करून गेलेली ही उन्हाची वेळ…