रविवार, २६ फेब्रुवारी, २०१७

प्रवास

प्रवास... प्रवास म्हणजे अनुभवांनी आणि आठवणींनी गच्च भरलेलं एक गाठोडं असतं... तो आधी आखला जातो, त्यावर योजना बनते आणि नंतर तो घडून येतो. कधी कधी तर तो अनपेक्षितपणेही घडतो... बर्याचदा आपल्या कल्पनेनेच आपण त्या जागी जाऊन आलेलो असतो पण प्रत्यक्षात जेव्हा तो घडून येतो तेव्हा कितीतरी वेगळा आणि अनोखा भासतो... खरंतर परतीच्या वाटेवरच आपण त्याला पुन्हा पुन्हा आठवायला लागलेलो असतो.. भरलेली बॅग, त्यातील मळलेले कपडे, चिखलात भरलेली पॅन्ट, कुठेतरी काट्यांमध्ये फाटलेली एखादी ओढणी, उन्हाने काळवंडलेले चेहेरे सगळं काही प्रवासाची आठवण करून देतं...
घरी परतल्यावरही जेव्हा ट्रेन मध्येच बसल्याचा भास होतो तेव्हा, काल परवा ह्या वेळेवर आपण अमुक एका जागी होतो असं आपोआप बोलायला लागतो तेव्हा, धुतल्यानंतरही पॅन्टच्या खिशात हात घालताच कोपऱ्यांमध्ये लपून बसलेली समुद्राची वाळू नखांमध्ये जाते तेव्हा, खरेदी केलेलं काही-बाही सामान कुणाला दाखवतो तेव्हा, वेगवेगळ्या जागी मनसोक्त काढलेले फोटो बघताना तो प्रवास पुनःपुन्हा जिवंत होत जातो...
कितीही प्रवास वर्णने झाली तरीही आतून अनुभवलेलं जे असतं ना ते क्वचितच सांगायला जमतं.. प्रवास एकदातरी अनुभवायलाच  हवा कारण काही अनुभव प्रयत्न करुनही शब्दात नाहीच बसत.. खूप काही सांगायचं राहून जातं.. वेगाने येणाऱ्या समुद्राच्या लाटा जेव्हा पायांना भेदून पुढे जातात आणि निमूटपणे समुद्राकडे परततात तेव्हा, पर्वतांच्या मोठमोठ्या पृष्ठांवर कोसळून परत फिरून आपल्याला ऐकू येणारा आपलाच आवाज आपण परत परत ऐकतो तेव्हा, मंदिरातल्या शांततेत उगाच सगळ्यांसाठी चांगला विचार करून प्रार्थना करतो तेव्हा, जोराने येणारं वारं अंगावर कोसळू देत ते श्वासात भिनत जातं तेव्हा, समोर काहीही न दिसणाऱ्या धुक्यात बाहेर पडून गरम चहाचा आस्वाद घेतो तेव्हा, कितीही उबदार कपडे घातले तरी त्यालाही भेदून जाणाऱ्या थंडीत बर्फ खेळल्या जातो तेव्हा, भर पावसात गच्च भिजत डोंगर चढतो तेव्हा जे काही वाटत असतं ते फक्त अनुभवावंच लागतं कारण त्याच भाषांतर प्रत्येकानुसार वेगळं आणि अनोखं असतं...
एकदा प्रवास झाला की तो नसानसांत भिनतो, एक एका जागेच सौंदर्य लगेच मनाच्या कोपऱ्यांत जाऊन दडून बसतं... जणूकाही त्याला आता तेथून निघणे नाहीच. कितीही वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन आलो तरी प्रत्येक जागेचं नाव काढताच तिथल्या निसर्गाचा आपल्या नजरेसमोर देखावा उभा राहतो, न विसरता सगळं काही अनुभवासकट बोलून दाखवू इतक स्पष्ट आठवतं.. कारण प्रवास कधी विसरताच येत नाही. ती एक अनुभवलेली नशा असते... म्हणूनच प्रवास वेड लावतं पुन्हा पुन्हा तीच नशा अनुभवायला, परत निसर्गाच्या जवळ जायला आणि परत डोंगर, दऱ्या, रेती, पाणी, ऊन, पाऊस, बर्फ या सगळ्यांशी खेळायला, निसर्गाशी एकरूप व्हायला...

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...