सोमवार, ६ जुलै, २०१५

देव

आपल्याला आतून बाहेरून पूर्णतः ओळखणारी व्यक्ती म्हणजे आपण स्वतः, त्याव्यतिरिक्त कुणीच जसेच्या तसे १००% ओळखूच शकत नाही, सगळ्यांना तुकड्या तुकड्याने अनुभव आलेला असतो आपला, मित्रांसमोर आपण वेगळे, पालकांसमोर वेगळे, शिक्षक, नातेवाईक, शेजारी, ऑफिस मधली मंडळी या सगळ्यांनाही आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भागच ओळखीचा असतो, काहींनी माणूस म्हणून आपले विविध पैलू ही अनुभवलेले असतात पण आपले विचार, स्वभाव, पूर्ण च्या पूर्ण एक व्यक्ती, वस्तू किंवा प्रमेय म्हणू हवं तर आणि तो प्रमेय कसा उलगडत जाणार, त्याच्या स्टेप्स आणि त्यासाठी लागणारी सूञे, ती कशी आणि कुठे मांडायची हेसुद्धा आपल्यालाच ठाऊक असतं...
पण जेव्हा जेव्हा मी देवासमोर हात जोडते मला असं वाटतं की मला सोडून मला पूर्णतः ओळखणारा तो हाच. मी त्याला बरंच काही मागण्याचा प्रयत्नही करते पण अर्ध्यातच सोडून बोलते की "तुला तर कळलेलंच आहे मला काय बोलायचं आहे ते", आणि जे बोलायचं ते अर्ध्यावरच सोडून फक्त हात जोडले जातात, आणि मनातल्या मनात देवासोबत गप्पा मारणं सुरु होतं, बोलते मीच आणि तो फक्त ऐकतो. हे सगळं सहज घडतं कारण विश्वास असतो की तो सगळंच समजतो आणि योग्य वेळी अचूकपणे तो सगळं काही व्यवस्थित, सुरळीत करेल... पण म्हणून काही मी भक्त ही नाहीये, रोज सकाळी देवाला हात जोडणे किंवा मनातल्या मनात त्याचे नाव घेणे एवढंच माझ्याकडून होतं बाकी नियमित मंदिरात जाणे उपवास करणे, जप करणे हे कधीच माझ्या कडून घडलेलं नाही, त्याची शक्यताही नाही...
कधी पाऊले फिरलीच तर देवळात जातेही, ते श्रद्धेपोटी आणि त्याहीपेक्षा तिथली शांतता हवीहवीशी वाटते म्हणून... त्यावेळी जे जे मनात येईल ते देवाला बोलते, रागही काढते कधी, त्याला बोलते की "का असं करतो तुला कळत नाहीए का गरज आहे सगळं सरळ सोप्प होण्याची", तो फक्त ऐकतो, कधी कधी आपल्याला आपलं बोलणं पूर्णतः ऐकून घेणाऱ्याची ही गरज असते ती ही भरून निघते... तो माझ्या मनात आहे, आनंदाच्या क्षणी, दुःखाच्या क्षणी एकांतात तो नेहमी असतो मनात. तो एक शक्ती आहे, त्याला रूपं अनेक, सगळ्या ठिकाणी एकच अनुभव येतो, मंदिर, चर्च, मस्जिद, गुरुद्वारा, मठ वास्तू कुठलीही असो तो एकच आहे आणि या वास्तूंच्या पुढून जरी जात असलो तरी त्याचं अस्तित्व समान जाणवतं…
इतका आपल्याला आतून बाहेरून ओळखणारा कदाचित तो एकटाच, कुणाच्या मते तो नसेलही, देव दानव ही संकल्पनाच कुणा कुणाला पटत नसेल, त्यांचे अनुमान त्यांच्यापाशी पण एक शक्ती नक्कीच आहे जी मनात उमेद जागी ठेवते नेहमी...
शेवटला सर्वकाही चांगलंच होईल ही उमेद देणारा, प्रत्येक क्षणाला सोबत करणारा, भल्याबुऱ्या प्रसंगात वाट दाखवणारा हा देव किंवा एक दैवी शक्ती...

व्यक्तीरत्ने

क्वचितच आयुष्यात काही व्यक्ती येतात जी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. तुमचा जीवनाविषयक दृष्टीकोन, तुमचे विचार, तुमचे वागणे, बोलणे, जगण्याच्या तऱ्हा सगळं काही बदलून जातं, एक वेगळीच नशा असते त्या जगण्यात... पण अशी वेळ येते की ती तुम्हाला सोडून जातात, कायमचं नाही पण नेहमीचा सहवास नसतो त्यात, पुन्हा कधी भेटणार याचा अंदाज नसतो, अपेक्षाही नसते कारण जगण्याने वळण घेतलं असतं पुढे जाण्यासाठी, प्रवास तिथपर्यंतच होता हे आपल्यालाही कळलेलं असतं... आठवण येते काही दिवस, ती प्रत्येक गोष्ट, जागा, काम ज्यात त्यांचा सहवास असतो ती त्यांची आठवण करून देते. कुठूनतरी आपणही निघालेलोच असतो, आपल्या लोकांना सोडून आलेलो असतो तर आता निरोप द्यायची वेळ आपली असते. निरोपाचे क्षणच मुळात दुखःद पण आयुष्य कुणाच्या जाण्याने थांबत नाहीच, ते पुढे पुढे जाताच राहणार. आपण विसरण्याचा प्रयत्न करतो आणि जाणारी वेळही आपल्याला ह्या दुखासोबत जगायला शिकवते...
ह्या सगळ्याचा एक फायदाही आहेच, आपण माणसं जोडत जातो…आणि माणसं जोडणं फार महत्वाचं कारण पैसा कधीच समाधान आणि निखळ आनंद देऊ शकत नाही. ही प्रत्येक वळणावर जुळत जाणारी माणसं भरपूर आनंद देऊन, अनुभव आणि बरंच काही शिकवून जातात...
अनपेक्षीतपणे कुठल्या ना कुठल्या वळणावर भेट होते, कधी बोलणं होतं आणि तेव्हा ही नव्याने होणारी जुनी भेट एक वेगळाच आनंद देऊन जाते...

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...