सोमवार, ६ एप्रिल, २०१५

शाळा

शाळा - एक अप्रतिम सिनेमा… कितींदा बघितला तरी प्रत्येक वेळा नवीन काही कारणासाठी लक्षात राहणारा…
हर एक पात्र विशिष्ट तर्हेने रंगवलंय आणि तसंच व्यक्त झालंय, मुकुंदा आणि त्याचे सुजाण वडील, सतत काळजी करणारी आई आणि ताई, चार मित्रांचा ग्रुप, त्याची "लाईन", नरु मामा, शिक्षक, वर्ग आणि विध्यार्थी, आणीबाणी आणि त्यातल्या हालचाली… तो काळ खूप सुंदर रित्या पडद्यावर मांडलाय…
काळ कुठलाही असो पण शाळेतले ते अनुभव आपण सगळ्यांनी थोडे अधिक जगलेच आहेत…
शाळा, त्यातली रोज होणारी प्रार्थना, त्यात मागे उभं राहून केलेली मस्ती, टवाळक्या, विनोद, आवडत्या शिक्षकांची घेतली जाणारी बाजू, काहींची टिंगल, प्रत्येक शिक्षकाला ठेवलेलं टोपण नाव आणि त्या नावाने आवाज देऊन पोटधरून हसणे, सिनेमाच्या गाण्यांच्या भेंड्या, सामूहीक खेळ, आपल्या ग्रुप वर असलेलं निस्सीम प्रेम…कुणाचही नाव न घेता सगळ्यांना आढनावाने हाक मारणे… हे सगळं आताही जसच्या तसं आठवतं…
मुकुंदा हा खरं तर सगळ्या विध्यार्थी वर्गाचं एक प्रातिनिधिक रुप असंच म्हणता येईल. शाळेतली सगळ्यात मस्तीखोर मुलं ही त्याची जिवाभावाची मित्र मंडळी, ते चौघेही वेगवेगळ्या स्तरातले, कुणी हुशार कुणी ढ, पण त्याचा त्यांच्या मैत्रीत कधीही ह्याचा प्रभाव नाही पडला, मन आणि वागणूक एकदम स्वछ आणि समान सगळ्यांसाठी…
आणखीही एक गोड विषय "प्रेम"
त्या लहान आणि अजाणत्या वयात असणारं ते प्रेम की आकर्षण हा मुद्दा वेगळा, ते ज्याचं त्याला ठाऊक पण त्या वयातला असणारा खूप रहस्यमय आणि गूढ तेवढाच गोड आणि प्रिय विषय… सगळ्यांना माहिती असायचं की कुणाची "लाईन" कोण, कोण कुणाला चोरून बघतं, पण त्या मुलाला किंवा मुलीला वाटायचं की आपलं हे गुपित फक्त आपल्यालाच माहितीये…
मुकुंदाला ती आवडायची खूप… पण त्याने तिला चार चौघांत कधीही हाक मारली नाही कींवा चिडवण्याचा प्रयत्न नाही केला, तो फक्त त्याच्या "लाईन" कडे  चोरून बघणारा, बाईंनी तिला रागावलं तर त्याचा बदला म्हणून "अनुशासन पर्व" फळ्यावर लिहून मार खाऊन घेणारा, सिनेमाच्या भेंड्यात हार पत्करून घेणारा, गरज नसतांना आणि मित्र सोबत नसतानाही फक्त तिच्यासाठी म्हणून शिकवणी लावणारा, थंडीतही तिच्याशी बोलायला ताटकळत उभा असणारा, तिच्याशी बोलण्यासाठी काहीही करायला तयार असणारा, तिच्या घराचा पत्ता शोधायला मदत केल्यावर मित्राला इंग्रजी ची शिकवणी देणारा असा हा मुकुंदा…
असेच त्या लहान वयातही प्रेम करणारे आपल्याही आजूबाजूला होतेच ना… त्या वेळी वाटायचं की हा काय वेडेपणा, कधी ते करताहेत ते चांगल वाटलाही तरी आपण त्याला वाईट भावनेत बदलायचो. का?? कारण आपल्या मनावर हेच बिंबवलं असतं अगदी सुरवातीपासून (निदान तेव्हातरी पालक असेच सांगायचे… ) तेव्हा अश्यांना प्रोत्साहन देणे तर दूरच पण चिडवायला लागायचो. पण "नरू मामा" मुकुंदा ला समजावताना म्हणतो ना की "घरून, बाहेरून, शाळेतून इतका विरोध असतांनाही ती किती धाडसाने प्रेम करते, आपण तर मानलं बुवा तिला, देश पुढे जातो तो अश्या धाडसी मुलामुलिंमुळेच"… तेव्हा वाईट वाटतं की आपणही त्या चिडवणाऱ्या मधलेच एक होतो, आपल्याला तेव्हा असं समजावणारा नरु मामा नाही ना भेटला… 
आता काळ बराच बदललाय, मुला-मुलीने आपसात बोलणे कुठेही वाईट मानले जात नाही पण कुणाला चोरून बघणे, त्यांच्या एका ओळखीच्या हास्यासाठी जीवापाड कष्ट घेणे, ती पहिल्या प्रेमाची किमया आणि जे काही न बोलता व्यक्त करण्याची धडपड चालते ती आताही तशीच आहे. त्यात क्वचितच बदल झालाय…
"शाळा" चा शेवट तसा दुखःदच. मुकुंदाचे मित्र त्याच्यासोबत दहावीच्या वर्गात नसणार हे दुखः पचवण्याचा प्रयत्न करणारा तो, त्याची "लाईन" त्याला न सांगताच दुसर्या गावी निघून गेल्यावर बाहेरच्या दाराला धरून केविलवाण्या चेहेऱ्याने बंद कुलुपाकडे बघत, मागून जाणाऱ्या आणिबाणीच्या मोर्चा चूकवून निघून जाणारा मुकुंदा खरंच मन हेलावून जातो… आणीबाणी आणि त्याची परीस्थीती यात उगाच काहीतरी साम्य वाटून जातं...
दहावीच्या एका भयाण वर्षाला सामोरं जायचं तेही एकट्याने असं म्हणून जोरजोरात एकटाच रडणारा मुकुंदा आपल्याही डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही…
तो म्हणतो ना सिनेमात की :
त्या दिवशी मला कळले की, शाळेची मजा कशात आहे ते
इथं वर्ग आहे, बाकं आहेत, पोरंपोरी आहेत, सर आहेत, गणित आहे, भूगोल आहे, अगदी नागरिकशास्त्र सुद्धा…
पण आपण त्यात कशातच नाही…
आपण त्या गायीच्या पाठीवर बसणाऱ्या पांढर्या पक्ष्यासारखे अगदी मुक्त आहोत…
ह्यांच्या शाळेत बसलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते, खास एकट्याचीच…
त्या शाळेला वर्ग नाहीत, भिंती नाहीत, फळा नाही, शिक्षक नाहीत, पण त्यातलं शिकण फार सुंदर आहे…

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...