सोमवार, २९ डिसेंबर, २०१४

आपली माणसं...

काही आपली माणसं (नात्यांच बंधन नाही) नेहेमीसाठी आपल्याजवळच असतात, कितीही भौगोलीक अंतर असलं तरीही… त्या व्यक्ती आपल्याला आणि आपण त्यांना नेहमी हवेहवेसे वाटतो… आयुष्याचा प्रवास अखंड सुरूच असतो आणि आपण पुढे पुढे जात असतो… त्यात प्रत्येक रस्त्यावर नवीन ओळखी होत जातात, तसच प्रत्येक वळणावर काही सोडूनही जातात (काही इच्छेने तर काही नाईलाजाने). आपण आपला रस्ता धरून निघतो पुढे पुढे आणि आणखी पुढे. जिंकण्याच्या किंवा जगण्याच्या शर्यतीत मागे राहून गेलेल्या आपल्या माणसांकडे वळून बघण्याची तसदी क्वचितच घेतो… पण काही माणसं विसरता विसरत नाहीत, तिथेच असतात मनाच्या एका कप्प्यात दडून… वाट वेगळ्या झालेल्या असल्या तरी मने नेहमीसाठी जुळून असतात… ते नातं तसंच ताजं आणि टवटवीत असतं. कधीही गरज पडल्यास हक्काने मदत मागता येणारी, आपल्या कितीही मोठ्या संकटाच ओझ झटक्यात कमी करू शकणारी, आपल्या चेहेऱ्यावर कधीही हास्याची लहर आणू शकणारी ही माणसं… काहीजण तर अनेक वर्षांनी भेटल्यानंतरही जिथून सोडून गेलो होतो त्याच काळात असल्यासारखे वागतात, अगदी वयाची, वेळेची सगळी बंधनं विसरून… अश्या वेळी एक सुंदर नातं धूळ झटकून नव्याने परत चमकायला लागतं… त्याच तेजाने, त्याच आनंदाने, आणि त्याच उत्साहाने… 

म्हणूनच, काही लोक आपल्यापासून दूर कधीच जात नाहीत…
ती तिथेच राहतात मनाच्या कप्प्यात घर करून…
आपण त्यांना बाहेर काढतही नाही आणि ते आपणहून जातही नाहीत…
एक कॉल, एक संदेश, किंवा एका हाकेने आपल्या आपलं आयुष्य पूर्णतः बदलू शकणारी ही माणसं…

प्रत्येकाचं आयुष्य अश्या व्यक्तींनी समृद्ध, श्रीमंत असतं… फक्त त्यांना सांभाळून ठेवणं गरजेचं असतं… आणि तो प्रयत्न प्रत्येकजण आपापल्या परीने करतच असतो, हा आनंदाचा ठेवा जपून ठेवण्याचा...

सरस्वती पूजन

 आम्ही लहान असतांना शाळेत सरस्वती पूजन असा एक कार्यक्रम असायचा. प्रत्येक वर्गाने तो आपापला वेगळा साजरा करायचा (किंवा कुणी मिळूनही साजरा कराय...